भारतीय संघाचा सलामीवर ऋतुराज गायकवाडने विक्रमी खेळी केली आहे. एकाच षटकांत 7 षटकार ठोकले असून, अशी खेळी करणारा ऋतुराज गायकवाड लिस्ट-ए क्रिकेटमध्ये जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू आहे. या विजय हजारे ट्रॉफीमधील आजचा सामना महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यात सुरू आहे. या सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 बाद 330 धावा केल्या आहेत. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने केलेल्या शानदार खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने 300 पार धावसंख्या केली.
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सामन्यात उत्तर प्रदेशच्या संघाने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडने 159 चेंडूत 220 धावांची नाबाद खेळी केली. यावेळी ऋतुराज गायकवाडने एकाच षटकांत 7 षटकार ठोकले आणि 43 धावा केल्या.
7 sixes in a single over by Ruturaj Gaikwad in Vijay Hazare Quarter-Final. pic.twitter.com/iS9ZqTddiP
— Johns. (@CricCrazyJohns) November 28, 2022
दरम्यान, लिस्ट-ए कारकिर्दीतील ऋतुराज गायकवाडचे हे 13वे शतक आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंग डावातील 49 वे षटक टाकत होता. त्याने 5वा चेंडू नो बॉल टाकला. यावरही ऋतुराजने षटकार ठोकला. अशाप्रकारे त्याने एकाच षटकात 7 षटकार ठोकले.
महाराष्ट्राकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 220 धावांची नाबाद द्विशतकी खेळी केली. तर अंकित बावणे आणि अजीम काझी यांनी प्रत्येकी 37-37 धावा करून संघाला मजबूत स्थितीत नेले. कार्तिक त्यागीशिवाय उत्तर प्रदेशच्या कोणत्याच गोलंदाजाला प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्यागीने सर्वाधिक 3 बळी पटकावले, तर अंकित राजपूत आणि शिवम शर्मा यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. आता उत्तर प्रदेशच्या संघासमोर विजयासाठी 331 धावांचे तगडे आव्हान असणार आहे.
महाराष्ट्राचा संघ :
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), राहुल त्रिपाटी, सत्यजीत बच्छाव, अंकित बावणे, अजीम काझी, दिव्यांग हिमगणेकर, सौरभ नवले, मुकेश चौधरी, मनोज इंगळे, राजवर्धन हंगरगेकर, शमशुजामा काझी.
हेही वाचा – फिफा विश्वचषक २०२२ : मोरोक्कोकडून बेल्जियमचा पराभव; ब्रसेल्समध्ये हिंसाचार, चाहत्यांनी पेटवल्या गाड्या