भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना रंगतदार स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकण्यासाठी भारतापुढे ३२८ धावांचे आव्हान ठेवले. याचा पाठलाग चौथ्या दिवसअखेर भारताची बिनबाद ४ अशी धावसंख्या होती. भारतीय संघ या सामन्यात मोठ्या फरकाने पिछाडीवर पडला असता. मात्र, शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलू खेळामुळे भारतीय संघाचे या कसोटीतील आणि प्रामुख्याने मालिकेतील आव्हान अजून कायम आहे, असे मत भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले. ब्रिस्बन येथे होत असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत शार्दूलने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीत उत्कृष्ट खेळ केला आहे. त्याने पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ४ अशा एकूण ७ विकेट घेतल्या. तसेच पहिल्या डावात त्याने ६७ धावांची खेळी केली. त्यामुळे सचिनने शार्दूलचे कौतुक केले.
Well done Mohd. Siraj on your 1st fifer and @imShard on your important all round performance which has kept the Test rather interesting so far and more importantly, the Test series alive. #AUSvIND pic.twitter.com/tXmLP2c9FN
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 18, 2021
पहिल्यांदा कसोटीच्या एका डावात ५ विकेट घेतल्याबद्दल मोहम्मद सिराजचे अभिनंदन. तसेच शार्दूलचे विशेष कौतुक करावे लागेल. त्याच्या अष्टपैलू खेळामुळे ही कसोटी रंगतदार स्थितीत आहे आणि त्याच्यामुळेच भारताचे या कसोटी मालिकेतील आव्हान कायम आहे, असे सचिनने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले. तसेच मागील आठवड्यात सचिनने मोहम्मद सिराजचीही स्तुती केली होती. खेळपट्टीकडून गोलंदाजांना मदत मिळत असल्याने नाही, तर योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याच्या क्षमतेमुळे सिराजला कसोटीत यश मिळत आहे, असे सचिन म्हणाला होता.
हेही वाचा – ब्रिस्बन कसोटी रंगतदार स्थितीत; भारताला विजयासाठी ३२८ धावांचे लक्ष्य