नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2002ने माझ्या टेनिस कारकीर्दीला मोठी चालना दिली. जेव्हा त्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतला तेव्हा मी फक्त सोळा वर्षांची होते. मी त्यावेळी चांगली कामगिरी केली आणि प्रकाशझोतात आले. ही कामगिरी माझ्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीसाठी अत्यंत योग्य अशी गती देणारी ठरली, असे भारतीय टेनिस जगतातली दिग्गज खेळाडू सानिया मिर्झा हिने म्हटले आहे.
नाविन्यपूर्ण खेळाचे दर्शन घडवणाऱ्या या हैदराबादच्या टेनिसपटूने आपल्या चमकदार कारकीर्दीत सहा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या. परंतु त्याअगोदर, सानियाने दोन दशकांपूर्वी भारतात खूप टेनिसस्पर्धांमध्ये भाग घेतला होता. दिल्लीत झालेल्या ज्युनियर नॅशनलपासून नॅशनल गेम्स आणि त्यानंतर हैदराबादमध्ये झालेल्या डब्ल्यूटीए स्पर्धेपर्यंत तिने विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. गुजरातच्या अंकिता रैनासह भारतातील बहुतांश टेनिसपटूसाठी तिचा टेनिस प्रवास हा प्रेरणेचा महान स्रोत ठरला आहे.
सुपरमॉम सानिया सात वर्षांनंतर गुजरातमध्ये नॅशनल गेम्स होत असल्याबद्दल खूप उत्साहात आहे. तिने केवळ टेनिसपटूच नव्हे तर सर्वच स्पर्धकांसाठी एक संदेश दिला आहे. स्वतःला आजमावण्यासाठी हा अगदी योग्य मंच आहे, त्यानंतर आंतरराष्ट्रीय मंचावर प्रारंभ करा, असे तिने म्हटले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आगळ्यावेगळ्या आहेत; कारण ज्यांनी अगोदरच अनेक आंतरराष्ट्रीय शिखरे सर केली आहेत, असे टेनिस स्टार आणि उदयोन्मुख खेळाडू यांचा इथे सुरेख मिलाफ असतो, असे सानियाने सांगितले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूंची उपस्थिती ही उदयोन्मुख प्रतिभाशाली खेळाडूंसाठी एक प्रेरणेचा महत्त्वाचा स्रोत ठरेल, असेही सानियाने सांगितले.