बांगलादेशचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनवर काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) दोन वर्षांची बंदी घातली. मॅच फिक्सिंगसाठी बुकीने त्याच्याशी संवाद साधला, पण याबाबतची माहिती शाकिबने आयसीसीला न दिल्याने त्याच्यावही कारवाई करण्यात आली. त्यामुळे तो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. तो संघात नसणे हे दोन खेळाडू संघात नसण्यासारखे आहे, असे विधान बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल हकने केले. तसेच अनुभवी सलामीवीर तमिम इक्बालचीही आम्हाला कमी जाणवेल असे मोमिनुल म्हणाला.
आमचे दोन अनुभवी खेळाडू या मालिकेत खेळणार नाहीत. त्यामुळे आमच्या संघात तीन खेळाडू नसण्यासारखेच आहे. शाकिब हा एकटाच दोन खेळाडूंचे काम करतो. तसेच तमिमचीही आम्हाला कमी जाणवेल. हे दोन खेळाडू नसताना खेळणे आव्हानात्मक आहे. मात्र, त्यामुळे आता इतर खेळाडूंना आपला खेळ उंचावत संघासाठी खास कामगिरी करण्याची संधी आहे, असे मोमिनुल म्हणाला.
शाकिबवर आयसीसीने बंदी घातल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मोमिनुलची कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड केली. या जबाबदारीमुळे त्याच्या फलंदाजीत सुधारणा होऊ शकेल असे मोमिनुलला वाटते. याबाबत त्याने सांगितले, मी कर्णधार झालो म्हणून फलंदाजीत बदल करणार नाही. या जबाबदारीमुळे माझ्या खेळात सुधारणाच होईल. कर्णधार बनल्यानंतर तुमचे खेळाचे ज्ञान वाढते.