घरक्रीडाशास्त्रीच मुख्य कारभारी

शास्त्रीच मुख्य कारभारी

Subscribe

अंशुमन गायकवाड यांनी दिले सूचक संकेत

वर्ल्डकप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. परंतु, या सर्व जबाबदार्‍यांमध्ये बदल करण्यात येणार असले तरी मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीच कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीने टीम इंडियाच्या प्रशिक्षक निवडीसाठी समिती स्थापन केली आहे. या समितीत कपिल देव यांच्यासह माजी खेळाडू अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे.

परंतु,या समितीतील गायकवाड यांनी शास्त्री यांच्या भविष्याबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. ‘टीम इंडियाच्या कामगिरीचा आलेख पाहता शास्त्री यांनी त्यांची जबाबदारी चांगल्या रितीने पार पाडली आहे. त्यामुळे शास्त्री वगळता अन्य पदांसाठी पर्याय निवडण्याचा मार्ग मोकळा आहे. या पदांसाठी बीसीसीआयने नेमलेल्या अटींची जो पूर्तता करेल, त्याची निवड होईल.’ असे गायकवाड यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी कार्यरत असलेल्या प्रशिक्षकांना आगामी वेस्ट इंडिज दौर्‍यापर्यंत 45 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या दौर्‍यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकांच्या फळीत बरेच बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हसेन आणि भारताचा माजी खेळाडू रॉबीन सिंग यांनी इच्छा व्यक्त केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण पदावर कायम राहतील, असे संकेत मिळाले असून फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची गच्छंती ठरली आहे. गेल्या 20 महिन्यात अरुण यांचे काम चांगले झाले. सध्याचा भारतीय मारा कसोटीसाठी सर्वोत्कृष्ट आहे. मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह फॉर्ममध्ये आहेत. याचे श्रेय अरुण यांना जाते. निवडकर्ते त्यांच्याऐवजी अन्य कुणाला प्राधान्य देण्याची शक्यता नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -