ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरला चांगली कामगिरी करता आली नाही. एकदिवसीय मालिकेच्या तीन सामन्यांत तो केवळ ५९ धावा करू शकला. टी-२० मालिकेमध्ये एका सामन्यात त्याने नाबाद १२ धावा केल्या, तर एका सामन्यात तो खातेही उघडू शकला नाही. त्यामुळे श्रेयसचे भारतीय संघातील स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे. परंतु, आता त्याला पुन्हा फॉर्मात येण्याची संधी असून तो आगामी विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत खेळणार आहे. या स्पर्धेसाठी त्याची मुंबईच्या कर्णधारपदी निवड झाली असून सलामीवीर पृथ्वी शॉ या संघाचा उपकर्णधार असेल. विजय हजारे करंडक स्पर्धेला २० फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.
सिद्धेश लाडला वगळले
विजय हजारे स्पर्धेसाठी बुधवारी मुंबईच्या २२ सदस्यीय संघाची घोषणा झाली. भारताच्या नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉचे मुंबईच्या संघात पुनरागमन झाले आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाडला मात्र संघात स्थान मिळालेले नाही. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या चार सामन्यांत त्याला केवळ २७ धावा करता आल्या होत्या. तसेच अर्जुन तेंडुलकरलाही संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.