दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज श्रेयस अय्यरने संघाच्या कर्णधारपदाबाबत मौन सोडले आहे. आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाचे नेतृत्व करणे मला पसंत आहे. परंतु, रिषभ पंतकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्याच्या निर्णयाचा मी सन्मान करतो, असे श्रेयस अय्यर म्हणाला. अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीने आयपीएलच्या १३ व्या हंगामात अंतिम सामन्यात मजल मारली होती. दरम्यान, खांद्याच्या दुखापतीमुळे यंदाच्या मोसमातील पहिल्या टप्प्यात अय्यर खेळू शकला नाही. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने पंतला कर्णधार म्हणून नियुक्त केले.
आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. पहिल्या टप्प्यातील सामन्यांमध्ये मुकलेल्या श्रेयरस अय्यरने दुसऱ्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबादविरोधात दमदार पुनरागमन केले आहे. अय्यर संघात परतला असला तरी संघ व्यवस्थापनाने पंतकडेच कर्णधारपद कायम ठेवले आहे. यानंतर अय्यरने कर्णधारपदाबाबात प्रतिक्रिया दिली. हा संघ व्यवस्थापनाच्या धोरणाचा एक भाग आहे आणि याबाबत माझी कोणतीही तक्रार नाही. माझे ध्येय हे संघाला विजय मिळवून देणे आहे, असे अय्यर म्हणाला. तसेच, पंत चांगल्या पद्धतीने संघाचे नेतृत्त्व करत आहे, असे उद्गार अय्यरने काढले.
अय्यर पुढे म्हणाला की, दडपणात खेळणे त्याला आवडते कारण अशा परिस्थितीत त्याचा खेळ अधिक चांगला होतो. त्याच्या फलंदाजीत कोणताही मोठा बदल झालेला नाही. आता मी फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे, असे अय्यर म्हणाला. मी कर्णधार होतो तेव्हा दडपणाखाली खेळणे मला आवडायचे. जेव्हा दबाव असतो, अधिक आव्हाने असतात तेव्हा मी चांगले प्रदर्शन करतो.