भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉने निराशाजनक कामगिरी केल्याने दुसऱ्या सामन्यात शुभमन गिलला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने करताना तीन कसोटीत २५९ धावा फटकावल्या. यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. ब्रिस्बन येथे झालेल्या अखेरच्या कसोटीत त्याचे शतक केवळ नऊ धावांनी हुकले. तसेच या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो सहाव्या स्थानावर राहिला. गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या कामगिरीने भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर प्रभावित झाला. मात्र, भारतीय संघातील स्थान टिकवून ठेवायचे असल्यास गिलला अधिक मेहनत घ्यावी लागेल, असे मत गंभीरने नमूद केले.
गिल प्रतिभावान खेळाडू
इंग्लंडविरुद्ध रोहित शर्मासोबत गिलने भारताच्या डावाची सुरुवात केली पाहिजे, यात जराही शंका नाही. परंतु, इतक्यातच गिलकडून मोठ्या अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. गिल हा खूप प्रतिभावान खेळाडू आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करणे आणि भारतीय संघात स्थान टिकवून ठेवणे सोपे नाही. त्यासाठी त्याला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे, असे गंभीर म्हणाला.
त्याला वेळ दिला पाहिजे
गिलने कसोटी कारकिर्दीची अप्रतिम सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये त्याने फारच चांगली फलंदाजी केली, यात जराही शंका नाही. मात्र, त्याच्यावर फार दबाव टाकणे आणि खूप अपेक्षा करणे योग्य नाही. त्याला भारतीय संघाने पाठिंबा देत स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेळ दिला पाहिजे, असेही गंभीरने सांगितले.
हेही वाचा – IPL 2021 : ‘हे’ तीन खेळाडू लिलावात राहणार अनसोल्ड?