दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाच्या दौऱ्यावर संकटाचे सावट पसरले आहे. भारतीय क्रिकेट संघ १७ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. दरम्यान आता दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे आणि पूर्ण खात्री दिली आहे की भारतीय संघासाठी सुरक्षित वातावरण तयार केले जाईल. दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासोबतच बीसीसीआयचे आभार मानले आहेत. कारण भारत ‘अ संघ आता सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे आणि कित्येक अडचणींनंतर देखील दौरा चालू ठेवला आहे. मंगळवारपासूनच भारत अ आणि दक्षिण आफ्रिकेच्या अ संघात दुसरा सामना सुरू होणार आहे.
दरम्यान, भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामध्ये ३ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ४ टी-२० सामन्यांचा समावेश आहे. भारतीय संघाला ८ डिसेंबरला भारतातून रवाना ह्वायचे आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन ओमिक्रॉन प्रकार आल्यानंतर या दौऱ्याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. भारत सरकार या दौऱ्यावरही लक्ष ठेवून आहे तर सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आली नाही.
बायो-बबलचे वातावरण केले जाणार
दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की भारतीय संघासाठी सर्व प्रकारची सुरक्षा तयार केली जाईल. जेव्हा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पाऊल ठेवेल तेव्हा संपूर्ण बायो-बबलचे वातावरणात सुरक्षा दिली जाईल.
भारताला जोहान्सबर्ग येथे १७ डिसेंबरपासून पहिला कसोटी सामना खेळायचा आहे. तर २६ डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये, ३ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये कसोटी सामने खेळायचे आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये होणारी मालिका खास आहे, कारण या मालिकेसोबतच दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पुनरागमनाला ३० वर्ष पूर्ण होणार आहेत.
हे ही वाचा: http://R Ashwin : ‘मला वाटले आता करियर संपणार…; IPL ने बदलले नशीब, अश्विनची भावूक प्रतिक्रिया