मिग्नन डू प्रीज आणि अनेके बॉश यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाला ५ विकेट राखून पराभूत केले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांची ही मालिका ४-१ अशी जिंकली. पाचव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताचा डाव ४९.३ षटकांत १८८ धावांत संपुष्टात आला. भारताकडून कर्णधार मिताली राजने अप्रतिम फलंदाजी करत १०४ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७९ धावांची खेळी केली. तिला हरमनप्रीत कौरने ३० धावा करत काहीशी साथ दिली. मात्र, भारताला दोनशे धावांचा टप्पाही पार करता आला नाही.
Congratulations to South Africa on winning the @Paytm #INDWvSAW ODI series 4-1.
Onto the T20Is next – Go #TeamIndia 💪💪 pic.twitter.com/RTzl6ciKzs
— BCCI Women (@BCCIWomen) March 17, 2021
चौथ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी
१८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. त्यांची ३ बाद २७ अशी अवस्था होती. परंतु, मिग्नन डू प्रीज (५७) आणि अनेके बॉश (५८) या दोघींनी चौथ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी रचत दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. या दोन्ही काही षटकांच्या अंतराने बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ अडचणीत सापडला होता. मात्र, मॅरिझन कापने (नाबाद ३६) चांगली फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. भारताच्या राजेश्वरी गायकवाडने १० षटकांत १३ धावांत ३ विकेट घेतल्या.