आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नुकतीच भारताच्या संघांची घोषणा झाली. भारताचा संघ ऑस्ट्रेलियात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी लोकेश राहुलचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. राहुलला मागील वर्षी कसोटी संघातून वगळण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्याने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यामुळेच त्याला कसोटी संघात पुन्हा स्थान मिळाले. मात्र, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधील कामगिरीच्या आधारे एखाद्या खेळाडूची कसोटी संघात निवड होणे भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरला आवडले नव्हते. त्याने राहुलच्या समावेशाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. परंतु, आता मांजरेकरवर भारताचे माजी सलामीवीर कृष्णमाचारी श्रीकांत यांनी टीका केली आहे.
कसोटीत चांगली कामगिरी
कोणत्याही गोष्टीवर प्रश्न उपस्थित करणे हे संजय मांजरेकरचे काम आहे. राहुलला कसोटी संघात घेतल्यामुळे मांजरेकरने प्रश्न उपस्थित केले. कशासाठी? राहुलने याआधी कसोटीत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे मांजरेकरने त्याच्या निवडीवर टीका करणे रास्त नाही. केवळ वाद निर्माण करायचा म्हणून प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही. राहुलने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत धावा केल्या आहेत, असे श्रीकांत म्हणाले.
मुंबई सोडून विचारच करू शकत नाही
राहुलला कसोटीत सातत्याने धावा करता आल्या नसल्या तरी त्याने ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि एक शतकही झळकावले होते. तो वेगवान गोलंदाजीविरुद्ध चांगला खेळतो. त्यामुळे त्याच्या निवडीवर प्रश्न उपस्थित करण्याचे कारण नाही. संजय मांजरेकर मुंबई सोडून विचारच करू शकत नाही. मांजरेकरसारख्या लोकांसाठी प्रत्येक गोष्ट मुंबईशी निगडित असते. मात्र, मुंबईच्या पलीकडेही जग आहे, अशीही टीका श्रीकांत यांनी केली.