टी-20 विश्वचषकात मागील दोन विजयानंतर भारतीय संघाचा पहिला पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट ठेवून भारतावर विजय मिळवला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारताने फलंदाज सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर 134 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले होते. (T20 World Cup 2022 South Africa won against India)
या सामन्यात प्रथम फलंदाजीवेळी भारतीय संघातील फलंदाजांना चांगली खेळी करता आली नाही. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, के. एल. राहुल आणि विराट कोहली या तीन खेळाडूंना चांगली फारशी चांगली खेळी करता आली नाही. हे तिघेही लवकर माघारी परतले. मात्र, या तिघांनंतर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमार यादवने संघाला धीर देण्याचे काम केले. त्याने अर्धशतकी खेळीच्या जोरावर संघाची धावसंख्या 100च्या पुढे नेली.
सूर्याने यावेळी 30 चेंडूंत आपले अर्धशतक साकारले. त्यानंतरही सूर्याने धडाकेबाज फटकेबाजी केली. सूर्याने या सामन्यात फक्त 40 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 68 धावा केल्या. भारताचा सूर्या हा असा एकच फलंदाज ठरला की ज्याला मोठी खेळी साकारता आली. त्यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेपुढे 134 धावांचे सन्मानजनक आव्हान ठेवता आले. भारताचे 134 धावांचे आव्हान माफ वाटत असले तरी भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीला उत्तम गोलंदाजी केली.
अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारने पहिले षटक चांगले टाकले. त्यानंतर मोहम्मद शमीनेही दमदार गोलंगादी करत दोन षटकांमध्ये फक्त चार धावा देत एक विकेटही मिळवला होता. मात्र त्यानंतर एडन मार्करम आणि डेव्हिड मिलर यांनी दमदार भागीदारी रचली आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उटलला. मार्करमने यावेळी 39 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतक झळकावल्यावर मात्र तो लगेच बाद झाला. हार्दिक पंड्याने मार्करमला 52 धावांवर असताना बाद केले.