आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) मंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत भारतात यंदा होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनाबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आणखी वेळ देण्याची आयसीसीकडे विनंती केली. त्यांची ही विनंती आयसीसीने मान्य केली असून टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनाबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयला २८ जूनपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली. ‘टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनाबाबतचा निर्णय घेण्यासाठी आम्हाला २८ जूनपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर आम्ही आयसीसीला आमचा निर्णय कळवायचा आहे,’ असे गांगुलीने सांगितले.
…तर युएईमध्ये होणार वर्ल्डकप
भारतामध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताना दिसत आहे. पुढील एका महिन्यात भारतातील कोरोनाची स्थिती बदलण्याची शक्यता असल्याने आयसीसीने बीसीसीआयला मुदत वाढवून दिल्याची माहिती आहे. तसेच भारतातील कोरोनाच्या स्थितीत सुधारणा न झाल्यास भारताऐवजी युएईमध्ये टी-२० वर्ल्डकपचे आयोजन केले जाईल, असेही समजते.
परिस्थिती सुधारेल असा विश्वास
मागील शनिवारी बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत आयसीसीकडून टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी जूनच्या अखेरपर्यंत किंवा जुलैच्या सुरुवातीपर्यंतचा वेळ मागून घेण्यात यावा, यावर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचे एकमत झाले होते. या स्पर्धेला अजून चार महिन्यांहून अधिक कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात भारतातील कोरोनाची परिस्थिती सुधारेल असा बीसीसीआयला विश्वास आहे.