भारताला २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतीम सामन्यात पराभूत केलं तसंच टी -२० विश्वचषकात (T20 World Cup) देखील पराभूत करू, असा दावा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने केला आहे. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. टी २० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून दोन्ही संघांमधील सामना २४ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.
पाकिस्तानने २०१७ रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला पराभूत केलं होतं. हा काळ आमच्यासाठी खूप चांगला होता, असं हसन अली म्हणाला. तसंच, येणाऱ्या टी-२० विश्वचषकात भारताला पुन्हा पराभत करु, असा दावा देखील अलीने केला. यासाठी आमचा सर्वोत्तम खेळू खेळू, असं अली म्हणाला. दरम्यान, आयसीसी स्पर्धांमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तान क्रिकेट संघाला विशेष कामगिरी करता आलेली नाही.
भारताविरुद्धच्या सामन्यात खूप दडपण
भारताविरुद्धच्या सामन्यात नेहमीच दडपण असतं, असं हसन अली म्हणाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा आयसीसी स्पर्धांमध्ये नेहमीच सर्वाधिक पाहिला जातो. जे लोक क्रिकेट सामने बघत नाहीत ते सुद्धा भारत-पाक सामने पाहतात, त्यामुळे खेळाडूंवर खूप दबाव असतो, असं अली म्हणाला. तसंच पुढे बोलताना त्याने आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ खेळण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास व्यक्त केला. याशिवाय, यूएईमधील खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी मदतगार असल्या तरी वेगवान गोलंदाज म्हणून आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करु, असं हसन अली म्हणाला. तसंच, विश्वचषकापूर्वीच मिसबाह-उल-हक आणि वकार युनूस मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षकपदावरून पायउतार झाल्याने आपण निराश झालो, अशी कबुली हसन अलीने दिली.