कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, यंदाचा टी-२० वर्ल्डकप (T20 World Cup) भारतातून युएईमध्ये हलवणे भाग पडले. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. भारतीय संघाला ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. भारताने २००७ साली झालेल्या पहिल्यावहिल्या टी-२० वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर मात्र भारताची जेतेपदाची पाटी कोरी आहे. तसेच कोहलीच्या नेतृत्वात अजून भारताला आयसीसीची जागतिक स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे त्याच्यावरही दडपण आहे. कोहलीने बीसीसीआयच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. तसेच टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची पुढील महिन्यात निवड होणार असल्याचे समजते.
चहल, जाडेजासह फिरकीपटू कोण?
भारतीय संघाची निवड करताना कर्णधार कोहली आणि निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे प्रमुख वेगवान गोलंदाज इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत आहेत. त्यांची टी-२० वर्ल्डकपसाठी निवड होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेदरम्यान त्यांना विश्रांती मिळणार का? मोहम्मद सिराजच्या कसोटीतील कामगिरीचा टी-२० संघाची निवड करताना विचार करायचा का? युजवेंद्र चहल आणि रविंद्र जाडेजा यांच्यासह कोणत्या फिरकीपटूंना संधी द्यायची? याचा निवड समितीला विचार करावा लागणार आहेत.
शिखर धवनला संधी नाही?
तसेच फलंदाजीतही निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला मिळून काही अवघड निर्णय घ्यावे लागणार आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा आणि कर्णधार कोहली सलामीला येण्याची शक्यता आहे. तसेच लोकेश राहुलची निवड निश्चित मानली जात आहे. त्यामुळे शिखर धवनला संधी मिळणार की संघाबाहेर ठेवले जाणार? तसेच सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर या मधल्या फळीतील दोन्ही फलंदाजांची निवड होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा – गांगुलीसह बीसीसीआयच्या प्रमुख अधिकाऱ्यांची कोहलीसोबत बैठक