युएईमध्ये होणाऱ्या आगामी टी-२० वर्ल्डकपचे (T20 World Cup) वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना २४ ऑक्टोबर रोजी दुबईत खेळला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांत असलेल्या राजकीय तणावामुळे या संघांत द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नाहीत. त्यामुळे टी-२० वर्ल्डकपमधील या सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. भारताचा हा या स्पर्धेतील पहिलाच सामना असणार आहे. पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही मोठ्या स्पर्धेत सुरुवातीला खेळणेच चांगले असल्याचे मत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने व्यक्त केले.
संपूर्ण स्पर्धेवर लक्ष केंद्रित करू शकता
२००७ सालच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये आमचा (भारताचा) सलामीचा सामना स्कॉटलंडविरुद्ध होता. परंतु, तो सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यानंतर आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळलो. त्यामुळे तोच आमचा त्या स्पर्धेतील पहिला सामना होता असे आपण म्हणू शकतो. भारताच्या दृष्टीने पाकिस्तानविरुद्ध स्पर्धेच्या सुरुवातीलाच खेळणे कधीही चांगले असते. तुम्हाला सतत त्या सामन्याचा विचार करावा लागत नाही. पाकिस्तानविरुद्धचा सामना झाल्यावर तुम्ही संपूर्ण स्पर्धेवर लक्ष केंद्रित करू शकता, असे गंभीर म्हणाला.
टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबर
यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार असल्याचा मला आनंद आहे, असेही गंभीरने नमूद केले. यंदा टी-२० वर्ल्डकपला १७ ऑक्टोबरपासून ओमान येथे सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी प्राथमिक फेरीत ओमानचा सामना पापुआ न्यू गिनीशी आणि बांगलादेशचा सामना स्कॉटलंडशी होणार आहे. प्राथमिक फेरीत दोन गटांतील अव्वल दोन संघ ‘सुपर १२’साठी पात्र ठरतील. ‘सुपर १२’ म्हणजेच मुख्य फेरीला २३ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. तसेच या स्पर्धेचा अंतिम सामना दुबईत १४ नोव्हेंबरला पार पडणार असून १५ नोव्हेंबर हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा – लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा संघ मूर्खपणे खेळला; दिग्गज क्रिकेटपटूची टीका