टी २० विश्वचषकातील भारतीय संघाचा इतिहास पाहता आजच्या घडीच्या भारतीय संघावर अनेक आजी माजी क्रिकेटर तज्ञमंडळी प्रश्न उपस्थित करत आहेत. स्पर्धेच्या सुरूवातीच्या दोन्हीही सामन्यात दारूण पराभवाचा सामना करावा लागेल याबाबत कोणालाच अपेक्षा नव्हती. स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून भारतीय संघाकडे पाहिले जात होते. मात्र सुरूवातीचे दोन्हीही सामने गमावल्यानंतर आता उपांत्य फेरीचा प्रवास देखील खडतर झाला आहे. याबाबतच टिप्पणी करताना पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरने सर्वांना थक्क करणारे ट्वीट करत भारतीय संघ पुन्हा विश्वचषकात पुनरागमन करेल याची मला आशा असल्याचे त्याने सांगितले आहे.
विश्वचषकाच्या चालू हंगामात भारतीय संघाला आपल्या दोन्हीही सामन्यात पराभव पत्करावा लागला. रविवारी झालेल्या न्यूझीलंडविरूध्दच्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघावर टीका टिप्पणी होत असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने एक थक्क करणारे ट्वीट केले आहे. त्याने म्हटले की, “माझा सर्वतोपरी विश्वास आहे की भारत अजूनही सर्वोत्तम संघ आहे. हा फक्त चांगल्या आणि वाईट वेळेचा भाग आहे, मात्र खेळाडू आणि त्यांच्या घरच्यांविषयी शिवीगाळ करणे ही लाजिरवाणी बाब आहे. क्रिकेट हा फक्त खेळ आहे हे विसरू नका”
न्यूझीलंडविरूध्दच्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने सांगितले की, नाणेफेकीला खूप महत्त्व असते, आणि चालू स्पर्धेतील सामन्याच्या निकालांवरून त्याचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. नाणेफेक ही महत्त्वाची असली तरी त्यापासून आपली फलंदाजी लपवता येत नाही. भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर तणाव असल्याचे पहायला मिळत होते. संघात आत्मविश्वास नाहीसा होत चालला आहे. सर्व खेळाडू चागंल्या वेळेची वाट बघत होते पण ती वेळ आलीच नाही.