भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर असून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने या मालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. परंतु, त्याचवेळी आगामी टी-२० वर्ल्डकपकडे (T20 World Cup) कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचे दुर्लक्ष झालेले नाही. भारतीय संघासाठी आणि कर्णधार कोहलीसाठी ही स्पर्धा खूप महत्त्वाची मानली जात आहे. लॉर्ड्स कसोटीत मिळवलेल्या अविस्मरणीय विजयामुळे कोहलीवरील दडपण कमी झाले आहे. परंतु, कोहलीचे कर्णधारपद युएईत होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधील निकालांवर अवलंबून असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच कोहलीने बीसीसीआयच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत टी-२० वर्ल्डकपबाबत चर्चा केल्याची माहिती आहे.
टी-२० वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने बैठक
लॉर्ड्सवर झालेल्या कसोटीदरम्यान कोहली, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यात बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीत टी-२० वर्ल्डकपच्या तयारीबाबत चर्चा झाल्याचे समजते. ‘बीसीसीआयच्या प्रमुख अधिकाऱ्यांची कोहलीसोबत बैठक झाली. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे सांगणे योग्य ठरणार नाही. परंतु, टी-२० वर्ल्डकपला आता फार कमी कालावधी शिल्लक आहे. आयपीएल स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला टी-२० सामना खेळण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे टी-२० वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने ही बैठक झाली,’ असे बीसीसीआयच्या सिनियर अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
एकत्रित टी-२० सामना खेळण्याची संधी नाही
भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेची १४ सप्टेंबरला सांगता होणार असून त्यानंतर १९ सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. टी-२० वर्ल्डकपपूर्वी भारतीय खेळाडूंना एकत्रित टी-२० सामना खेळण्याची फारशी संधी मिळू शकणार नाही. त्यामुळेच मी महत्त्वाची बैठक झाल्याची चर्चा आहे. यंदा टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये खेळला जाणार आहे.
हेही वाचा – पाकची भारतीय संघाशी तुलना होऊच शकत नाही; गंभीरचा टोला