सलामीवीर शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान मिळाले. विश्वचषक स्पर्धेसाठी १५ जणांचा संघ घोषित करताना एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने पंतला डावलून दिनेश कार्तिकला संघात स्थान दिले. मात्र, ही संधी नाकारल्यानंतर आपल्यामध्ये सकारात्मक बदल झाल्याचे ऋषभ पंत म्हणाला.
सुरुवातीच्या संघात माझी निवड झाली नव्हती, त्यावेळी माझ्या कामगिरीत काही उणीव राहिली असेल असे मला वाटले. मात्र, यानंतर मी अजून सकारात्मक झालो. माझा खेळ अजून कसा सुधरवता येईल याकडे लक्ष दिले. आयपीएलमध्ये दिल्लीविरुद्ध खेळत असताना मी चांगली कामगिरी केली, त्यानंतरही मी सराव सुरू ठेवला. याचाच मला फायदा झाला.
पंत सहकारी चहलशी संवाद साधत होता. एक क्रिकेटपटू म्हणून विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे माझे स्वप्न होते. ज्यावेळी शिखर धवनच्या जागेवर मला पर्याय म्हणून इंग्लंडला बोलवण्यात आले, त्यावेळी मी आईसोबत होतो. तिला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तिने लगेच मंदिरात जाऊन आपला नवस पूर्ण केला. मी देखील तेव्हा खूप आनंदात होतो,असे पंतने म्हटले आहे.