भारतीय संघाच्या बऱ्याच प्रमुख खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापती झाल्या. त्यामुळे भारताला कसोटी मालिकेत बऱ्याच नवख्या खेळाडूंना घेऊन खेळावे लागले. त्यातच अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताचा डाव ३६ धावांत आटोपला होता. त्यानंतर भारतीय संघ अशाप्रकारे पुनरागमन करेल आणि कसोटी मालिका जिंकेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती, असे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले. तसेच भारताचा हा सर्वात अविस्मरणीय विजय होता असे शास्त्री यांना वाटते. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. यंदाच्या मालिकेत मात्र मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, रविंद्र जाडेजा, लोकेश राहुल यांसारख्या खेळाडूंना दुखापत झाली. मात्र, भारतीय संघाने हार मानली आहे, असेही शास्त्री म्हणाले.
Fortress Gabba captured as #TeamIndia beat Australia and win the Border-Gavaskar Series 2-1.#AUSvIND
— BCCI (@BCCI) January 19, 2021
भारतीय क्रिकेटमधील हा सर्वात आव्हानात्मक दौरा होता. पहिल्या कसोटीत ३६ धावांत ऑल-आऊट झाल्यानंतर आम्ही अशाप्रकारे पुनरागमन करू असे कोणालाही वाटले नव्हते, असे शास्त्री यांनी सांगितले. भारतीय संघाने ब्रिस्बन कसोटीत ३२८ धावांचे लक्ष्य यशस्वीरीत्या गाठले. भारताच्या या विजयात रिषभ पंतने नाबाद ८९ धावांची खेळी करत महत्वाची भूमिका बजावली. त्याचे कौतुक करताना शास्त्री म्हणाले, पंत सतत धावफलकाकडे पाहत होता. तो सुरुवातीपासूनच भारतीय संघाला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात होता. आक्रमक शैलीमुळे त्याच्यावर बरेचदा टीका होते. मात्र, प्रशिक्षक म्हणून मी त्याला नैसर्गिक खेळ करण्याची मोकळीक दिली आहे. परंतु, आता त्याच्या खेळात संयमही आला आहे.