भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला शनिवारपासून सुरुवात झाली. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व राहिले. अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने केलेल्या शतकामुळे भारताची पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३०० अशी धावसंख्या होती. रोहितने आपले कसोटी क्रिकेटमधील सातवे शतक करताना २३१ चेंडूत १८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १६१ धावांची खेळी केली. त्याला उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ६७ धावा करत उत्तम साथ दिली. मात्र, पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात भारताचा संघ अडचणीत सापडला होता. या सामन्यात फिरकीपटूंना सुरुवातीपासून मदत मिळत असल्याचे दिसले. त्यामुळे बहुधा हा कसोटी सामना तीन-साडे तीन दिवसांत संपेल असे ट्विट भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंगने केले.
First session of the test match 🤔 Ball spinning like 8th day of the match #INDvsENG this test match will be over in 3 or 3 an half days I guess
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) February 13, 2021
मायकल वॉनचीही टीका
‘या कसोटीचे केवळ पहिले सत्र सुरु आहे. मात्र, चेंडू सामन्याचा आठवा दिवस असल्यासारखा स्पिन होत आहे. बहुधा हा कसोटी सामना तीन-साडे तीन दिवसांमध्ये संपेल,’ असे मत हरभजनने व्यक्त केले. हरभजन सिंगप्रमाणेच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही या सामन्याच्या खेळपट्टीवर टीका केली. ‘नाणेफेक गमावल्यानंतर या बीचवर इंग्लंडने विजय मिळवला, तर ही कामगिरी फारच उत्कृष्ट असेल,’ असे वॉन त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला.
If England win this week having lost the toss on this beach … it will be a remarkable Victory … #INDvENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) February 13, 2021
हेही वाचा – ‘हिटमॅन’चे दमदार शतक; पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३००