भारताच्या नेमबाजांनी टोकियो ऑलिम्पिकची सांगताही निराशाजनक निकालांसह केली. सोमवारी झालेल्या पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि संजीव राजपूत या भारतीय नेमबाजांचे आव्हान पात्रता फेरीत संपुष्टात आले. त्यामुळे भारतीय नेमबाज सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांतून पदकाविनाच मायदेशी परतणार हे आता निश्चित झाले आहे. भारताच्या नेमबाजांना २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये एकही पदक जिंकता आले नव्हते. त्यानंतर मात्र भारतीय नेमबाजांनी वर्ल्डकप स्पर्धा, राष्ट्रकुल आणि एशियाड अशा सर्वच स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांकडून पदकांची अपेक्षा केली जात होती. परंतु, त्यांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले.
तोमर २१ व्या, तर राजपूत ३२ व्या स्थानावर
सोमवारी झालेल्या पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकाराच्या पात्रता फेरीत तोमरला २१ व्या, तर राजपूतला ३२ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. अव्वल आठ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्याने भारताचे दोन्ही नेमबाज पात्रतेतच गारद झाले. तोमरला एकूण ११६७ गुण, तर तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या राजपूतला ११५७ गुणच मिळवता आले. अंतिम फेरी गाठण्यासाठी ११७६ गुण गरजेचे होते.
Aishwary Pratap Singh Tomar and Sanjeev Rajput finish the qualification round at 20th and 32nd place with 1167 and 1157 points respectively.
The top 8 shooters qualify for the final.
Stay tuned for more Olympics updates. #Cheer4India— SAIMedia (@Media_SAI) August 2, 2021
भारताचे नेमबाज अपयशी
भारताचे तब्बल १५ नेमबाज यंदाच्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले होते. त्यांच्याकडून दमदार कामगिरीसह पदकांची अपेक्षा केली जात होती. परंतु, भारतीय नेमबाज एकही पदक जिंकू शकले नाहीत. इतकेच नाही, तर पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सौरभ चौधरी वगळता भारताच्या एकाही नेमबाजाला पात्रता फेरीचा अडथळा पार करता आला नाही. त्यामुळे ऑलिम्पिकनंतर कठोर पावले उचण्याचे संकेत भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रणिंदर सिंग यांनी दिले आहेत.