भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८ ते १० पदके जिंकण्यात यश येईल, असा भारताचा माजी कुस्तीपटू योगेश्वर दत्तला विश्वास आहे. ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला असून आता शनिवारपासून मुख्य स्पर्धांना सुरुवात होईल. यंदा भारताकडून दमदार कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. भारताने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदके पटकावली होती. ही भारताची ऑलिम्पिक स्पर्धांमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा मात्र भारतीय खेळाडू नवा विक्रम प्रस्थापित करतील याची योगेश्वरला खात्री आहे.
लंडन ऑलिम्पिकपेक्षा अधिक पदके मिळतील
देशाला खेळाडूंकडून खूप अपेक्षा आहेत. संपूर्ण देश खेळाडूंसाठी प्रार्थना करत आहे. आपण यंदा खूप पदके जिंकू अशी सर्वांनाच आशा आहे. माझ्या मते, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये आपल्याला ८ ते १० पदके जिंकण्यात यश येईल. हॉकी, बॅडमिंटन आणि कुस्तीमध्ये भारताला पदके मिळण्याची शक्यता आहे, असे योगेश्वर म्हणाला. भारताचे कुस्तीपटू २-३ पदके जिंकू शकतील. भारतीय कुस्तीपटू दमदार कामगिरी करतील असा मला विश्वास आहे. आपले सर्वच खेळाडू पदकांसाठी उत्सुक आहेत. यंदा आपल्याला लंडन ऑलिम्पिकपेक्षा अधिक पदके मिळतील याची मला खात्री असल्याचे योगेश्वर म्हणाला.
मल्लेश्वरी योगेश्वरशी सहमत
भारताची माजी वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरीही योगेश्वरच्या मताशी सहमत होती. भारताला १०-१२ पदके मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको, असे ती म्हणाली. आपण सकारात्मक विचार करत आहोत. मागील काही काळात आपल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूकडून मला खूप अपेक्षा आहेत. तिने यंदाच्या स्पर्धेसाठी चांगली तयारी केली आहे. त्यामुळे ती पदक जिंकेल अशी मला आशा आहे. आपल्याला यंदा १०-१२ पदके मिळू शकतील, असे मल्लेश्वरीने नमूद केले.