पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारत २२८ जणांचे पथक टोकियोत पाठवणार असल्याचे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (IOA) अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी सांगितले. कोणत्याही ऑलिम्पिकसाठी जाणारे हे सर्वात मोठे भारतीय पथक असणार आहे. या २२८ जणांमध्ये ११९ खेळाडूंचा समावेश असून यापैकी ६७ खेळाडू पुरुष असून ५२ खेळाडू महिला असल्याची माहिती बात्रा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. मोदी यांनी मंगळवारी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंसोबत संवाद साधला.
Let us all #Cheer4India. Interacting with our Tokyo Olympics contingent. https://t.co/aJhbHIYRpr
— Narendra Modi (@narendramodi) July 13, 2021
पहिले पथक १७ जुलै रोजी टोकियोसाठी रवाना
एकूण २२८ जणांचे भारतीय पथक टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणार आहे. तसेच यात ६७ पुरुष खेळाडूंचा आणि ५२ महिला खेळाडूंचा समावेश असेल. भारतीय खेळाडू एकूण ८५ क्रीडास्पर्धांमध्ये पदकासाठी खेळणार आहेत, असे बात्रा यांनी पंतप्रधानांना सांगितले. कोणत्याही ऑलिम्पिकसाठी जाणारे हे सर्वात मोठे भारतीय पथक असणार आहे. भारताचे पहिले पथक १७ जुलै रोजी टोकियोसाठी रवाना होईल. यात खेळाडू आणि अधिकारी मिळून एकूण ९० जण असतील, असेही बात्रा म्हणाले.
पंतप्रधानांचा खेळाडूंशी संवाद
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी खेळाडूंशी संवाद साधला. तुम्ही जेव्हा इतक्या मोठ्या स्तरावर पोहोचता, तेव्हा तुमच्याकडून सर्वांनाच खूप अपेक्षा असतात. आगामी ऑलिम्पिकमध्ये तुम्ही देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी कराल याची खात्री असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. मेरी कोम (बॉक्सिंग), सानिया मिर्झा (टेनिस), दीपिका कुमारी (तिरंदाजी), नीरज चोप्रा (भालाफेक) आणि द्युती चंद (धावणे) आदी खेळाडूंनी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या चर्चा सत्रात भाग घेतला होता. यात प्रवीण जाधव या महाराष्ट्रातील तिरंदाजाचाही समावेश होता.