भारतीय पुरुष हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. मंगळवारी झालेल्या सामन्यात विश्वविजेत्या बेल्जियमने भारताला ५-२ असे पराभूत केले. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये ४१ वर्षांनंतर सुवर्णपदक जिंकण्याचे भारतीय पुरुष हॉकी संघाचे स्वप्न अधुरेच राहिले. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. भारताला पाच पैकी चार साखळी सामने जिंकण्यात यश आले होते. तसेच उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी ग्रेट ब्रिटनवर ३-१ अशी मात केली. बेल्जियमविरुद्ध मात्र भारताचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चर्चा केली.
दमदार कामगिरीबद्दल कौतुक
मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमधील दमदार कामगिरीबद्दल भारतीय पुरुष हॉकी संघाचे कौतुक केले. तसेच कांस्यपदकासाठी गुरुवारी होणाऱ्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याआधी मोदी यांनी ट्विट करतही भारतीय संघाला प्रोत्साहन दिले होते. ‘विजय आणि पराभव हे जीवनाचा भागच आहेत. आपल्या पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आणि हे सर्वात महत्त्वाचे आहेत. पुढील सामन्यासाठी आणि भविष्यासाठी या संघाला खूप शुभेच्छा. भारताला आपल्या खेळाडूंचा अभिमान आहे,’ असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले.
Wins and losses are a part of life. Our Men’s Hockey Team at #Tokyo2020 gave their best and that is what counts. Wishing the Team the very best for the next match and their future endeavours. India is proud of our players.
— Narendra Modi (@narendramodi) August 3, 2021
कांस्यपदक जिंकण्याची संधी
बेल्जियमविरुद्धच्या पराभवामुळे भारतीय संघ सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. परंतु, भारताला अजूनही कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. कांस्यपदकाचा सामना गुरुवारी होणार असून भारतापुढे ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीच्या यांच्यातील पराभूत होणाऱ्या संघाचे आव्हान असेल. भारताने १९८० साली ऑलिम्पिकमधील अखेरचे पदक जिंकले होते. यंदा हा पदकाचा दुष्काळ संपवण्याचा भारताचा प्रयत्न आहे.