आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी राणी रामपालची भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. तसेच उपकर्णधार म्हणून दीप ग्रेस एक्का आणि सविता या दोघींची नेमणूक झाली आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताने मागील आठवड्यात १६ सदस्यीय संघाची घोषणा केली होती. परंतु, त्यावेळी कर्णधार म्हणून कोणाचीही निवड झाली नव्हती. आता राणी रामपालकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. राणीच्या नेतृत्वात भारताने २०१७ आशिया चषक जिंकला होता. तसेच भारताला २०१८ एशियाड आणि २०१८ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रौप्यपदक जिंकण्यात यश आले होते. राणी कर्णधार असतानाच २०१९ मध्ये भारताने एफआयएच फायनल स्पर्धाही जिंकली होती.
Rani to lead the Indian Women’s Hockey Team’s #Tokyo2020 campaign, while Deep Grace Ekka and Savita will share Vice-Captain responsibilities. 🏑
More details ➡️ https://t.co/OI5vKcqVje#IndiaKaGame #HaiTayyar #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey
— Hockey India (@TheHockeyIndia) June 21, 2021
माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट
ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सिनियर खेळाडू जबाबदारी घेऊन खेळत असल्याने मागील काही वर्षांत कर्णधार म्हणून माझे काम सोपे झाले आहे, असे हॉकी इंडियाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात राणी म्हणाली. टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याबद्दल राणीचे अभिनंदन, असे भारताचे प्रशिक्षक जोर्द मरीन म्हणाले.
दोन उपकर्णधार भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर
तसेच ऑलिम्पिकसाठी उपकर्णधार म्हणून दीप ग्रेस एक्का आणि सविता या दोघींची नेमणूक झाली आहे. दोन उपकर्णधार निवडण्याविषयी प्रशिक्षक मरीन म्हणाले, दोन उपकर्णधार असणे भविष्याच्या दृष्टीने आमच्यासाठी फायदेशीर ठरेल. टोकियोमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी या दोघींचे अनुभव आणि त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असेल.