भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना विशेष संदेश दिला आहे. यंदा टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला आता अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा २३ जुलैला पार पडणार असून दुसऱ्या दिवसापासून स्पर्धांना सुरुवात होईल. भारताच्या खेळाडूंकडून यंदा दमदार कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. परंतु, त्यांना चाहत्यांच्या पाठिंब्याचीही आवश्यकता आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन विराट कोहली आणि मिताली राजसह भारताच्या बऱ्याच क्रिकेटपटूंनी केले होते. आता यात सचिनचाही समावेश झाला आहे.
सर्वोत्तम कामगिरीसाठी मेहनत घेत आहेत
आपल्या सर्वांनाच अनेक आव्हानांचा सामना करावा लागला असून याला आपले खेळाडू अपवाद ठरलेले नाहीत. आपले खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी मेहनत घेत आहेत. त्यांना आपण प्रोत्साहन देऊया, असे सचिन बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हणाला. सचिनच्या आधी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही चाहत्यांना भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते.
The legendary @sachin_rt is cheering for our Indian athletes at @Tokyo2020 👍 👍
Let’s join him & #Cheer4India 🇮🇳 👏 👏@IndiaSports | @Media_SAI | @WeAreTeamIndia pic.twitter.com/6Rc0N0bVlq
— BCCI (@BCCI) July 19, 2021
भारताचे पहिले पथक टोकियोमध्ये दाखल
ऑलिम्पिकला आता अवघे चार दिवस शिल्लक असून भारताचे ८८ जणांचे पहिले पथक टोकियोमध्ये दाखल झाले आहे. तिरंदाजी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, ज्युडो, जिम्नॅस्टिक्स, जलतरण आणि वेटलिफ्टिंग अशा आठ क्रीडा प्रकारांतील भारताचे खेळाडू, प्रशिक्षक आणि अन्य अधिकारी टोकियोमध्ये आले. हे पथक शनिवारी रात्री नवी दिल्लीहून एअर इंडियाच्या चार्टर्ड विमानाने जपानच्या राजधानी टोकियोसाठी रवाना झाले होते.