गोलरक्षक पीआर श्रीजेश भारतीय हॉकीच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो. श्रीजेशने भारताकडून खेळताना १५ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. परंतु, त्याला वर्ल्डकप आणि ऑलिम्पिकमध्ये पदकाने हुलकावणी दिली आहे. यंदा टोकियोमध्ये तो त्याच्या तिसऱ्या आणि बहुतेक अखेरच्या ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न त्याला साकार करायचे असून कोरोनामुळे मागील काही काळात केलेले त्याग त्याला वाया जाऊ द्यायचे नाहीत.
आम्ही खूप त्याग केले आहेत
मागील काही महिन्यांत आम्ही खूप त्याग केले आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारण्यास सुरुवात करता. मी माझ्या कुटुंबापासून का दूर आहे? मी माझ्या मुलांपासून का दूर राहत आहे? परंतु, मला या प्रश्नांची उत्तरे माहित आहेत. भारतीय हॉकीला खूप मोठा आणि यशस्वी इतिहास आहे. मी माझ्या कारकिर्दीत जवळपास सर्वच स्पर्धा जिंकल्या आहेत. परंतु, मला ऑलिम्पिक किंवा वर्ल्डकपमध्ये पदक जिंकता आलेले नाही, असे श्रीजेश म्हणाला.
ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणे स्वप्न
यंदाचे ऑलिम्पिक बहुतेक माझे अखेरचे असेल. त्यामुळे खेळाडू म्हणून मी या ऑलिम्पिकमधून काय मिळवू शकतो? याचा विचार करत आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणे हे माझे स्वप्न आहे आणि त्यासाठीच मी इतके त्याग केल्याचे श्रीजेश म्हणाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या हॉकीपटूंना आपल्या कुटूंबापासून दूर राहून सराव शिबिरात भाग घ्यावा लागला. हे खेळाडूंसाठी मानसिकदृष्ट्या अवघड होते, असे श्रीजेशने सांगितले.