युएईमध्ये होणारी यंदाची आयपीएल स्पर्धा आता मध्यापर्यंत पोहोचली आहे. काही संघांना, काही खेळाडूंना दमदार खेळ करण्यात यश आले आहे. मात्र, काही खेळाडूंना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत यांना भारताच्या काही नवख्या, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेल्या खेळाडूंनी खूप प्रभावित केले आहे. या खेळाडूंनी त्यांच्या संघांच्या विजयांमध्ये महत्त्वाचे योगदान दिल्याचे श्रीकांत यांना वाटते.
भारतीय क्रिकेटच्या हिताची गोष्ट
आता आपण आयपीएलच्या मध्यापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. दोन संघ (दिल्ली आणि मुंबई) पुढील फेरीत प्रवेश करणार हे जवळपास निश्चितच वाटत आहे, तर गुणतक्त्यात तळाला असलेल्या दोन संघांना विजय मिळवणे अवघड जात आहे. अव्वल दोन संघ वगळता प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणारे इतर दोन संघ कोण असणार हे सांगणे अवघड वाटत आहे. त्यामुळे सर्वच संघांसाठी आगामी सामने खूप महत्त्वाचे आहेत. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये मला काही नवख्या, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेल्या भारतीय खेळाडूंनी खूप प्रभावित केले आहे. ही भारतीय क्रिकेटच्या हिताची गोष्ट आहे. या युवा खेळाडूंची कामगिरी वाखाणण्याजोगी असून ते आणखी वरच्या स्तरावर खेळण्यासाठी तयार असल्याचे आपल्याला दिसले आहे, असे श्रीकांत म्हणाले.
टी-२० क्रिकेटसाठी साजेसा खेळ
बंगळुरूचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलमध्ये खूप प्रतिभा आहे. हैदराबादच्या नटराजनमध्ये सामन्यागणिक सुधारणा होत असल्याचे आपण पाहत आहोत. मात्र, मला सर्वाधिक कोणत्या खेळाडूने प्रभावित केले असेल, तर ते म्हणजे राहुल तेवातियाने. त्याने अप्रतिम फलंदाजी करत आपल्या संघाला दोन सामने जिंकवून दिले आहेत. तो चांगली गोलंदाजीही करू शकतो. त्याचा खेळ टी-२० क्रिकेटसाठी साजेसा असल्याचेही श्रीकांत यांनी सांगितले.