भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना शुक्रवारी पार पडला. या सामन्यात इंग्लंडने भारताला ८ विकेट राखून पराभूत करत पाच सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मुंबईकर श्रेयस अय्यर वगळता भारताच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. भारताचा कर्णधार विराट कोहली मोठा फटका मारण्याच्या नादात खातेही न उघडता माघारी परतला. त्यानंतर उत्तराखंड पोलिसांनी कोहलीचे उदाहरण देत नागरिकांना ड्रायविंगबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न केला होता. ‘केवळ हेल्मेट घालणे पुरेसे नाही! तुम्ही पूर्ण लक्ष देऊन गाडी चालवणे गरजेचे असते अन्यथा तुम्हीसुद्धा कोहलीप्रमाणे शून्यावर बाद होऊ शकता,’ असे उत्तराखंड पोलिसांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले. मात्र, आता उत्तराखंड पोलिसांनी हे ट्विट डिलीट केले आहे.
चाहत्यांनी केली टीका
ड्रायविंगबाबत जागरूकता आणण्यासाठी उत्तराखंड पोलिसांनी कोहली शून्यावर बाद होण्याचे उदाहरण दिले हे चाहत्यांना फारसे आवडले नाही. चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोहलीला समर्थन दर्शवताना उत्तराखंड पोलिसांवर टीका केली. त्यामुळे आता उत्तराखंड पोलिसांना त्यांचे ट्विट डिलीट करावे लागले आहे.
पहिल्या सामन्यात भारत पराभूत
शुक्रवारी झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडने ८ विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत केवळ ७ बाद १२४ धावाच करता आल्या. श्रेयस अय्यरने एकाकी झुंज देत ६७ धावांची खेळी केली. इंग्लंडने १२५ धावांचे लक्ष्य अवघ्या १५.३ षटकांत गाठत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.