भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच कसोटी मालिका झाली. या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये झाले. पहिल्या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला, पण त्यानंतर दमदार पुनरागमन करत भारताने सलग तीन सामने जिंकत चार सामन्यांची ही मालिका ३-१ अशी जिंकली. पहिल्या कसोटीत मात्र भारतीय संघाला चांगला खेळ करण्यात अपयश आले. या सामन्याच्या पहिल्या डावात कर्णधार जो रूटच्या द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडने ५७८ धावांची मजल मारली. इंग्लंडचा युवा फलंदाज ऑली पोपने या डावात ३४ धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावात मात्र इंग्लंडचा संघ १७८ धावांत गारद झाला आणि पोपने २८ धावा केल्या. मात्र, तो फलंदाजी करत असताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्याजवळ जाऊन त्याला ताकीद दिली.
तेव्हाच कळले फलंदाजी आव्हानात्मक असणार
पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात चेंडू खूप वळत होता. मला त्यावेळची एक गोष्ट अजूनही आठवते. मी नॉन-स्ट्राईकवर आणि त्यावेळी कोहली माझ्याजवळ येऊन म्हणाला, ‘ही या मालिकेतील अखेरची पाटा खेळपट्टी आहे.’ त्याने मला ताकीदच दिली. त्याक्षणीच मला कळले होते की या मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये फलंदाजी करणे खूप आव्हानात्मक असणार आहे, असा किस्सा पोपने सांगितला.
अनुभव ठरेल फायदेशीर
इंग्लंडने या मालिकेची दमदार सुरुवात केली. मात्र, त्यानंतर त्यांचा खेळ खालावला. पोपला या मालिकेचे चारही सामने खेळण्याची संधी मिळाली, पण त्याला केवळ १५३ धावाच करता आल्या. त्याला एकही अर्धशतक करता आले नाही. या मालिकेत फारशा धावा करता आल्या नसल्या तरी हा अनुभव खूप फायदेशीर ठरेल, असे पोपला वाटते.