भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (BCCI )अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारतीय संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहली यांच्यामधील वादात माजी निवडकर्ते आणि भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक दिलीप वेंगसरकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान कर्णधार पदावरून पायउतार झाल्यानंतर विराट कोहलीने बोर्डाचे अध्यक्ष गांगुली यांच्या विरोधात जाऊन विधान केले होते. गांगुली यांनी म्हटले होते की, विराटला बोर्डाने आणि निवडकर्त्यांनी टी-२० चे कर्णधारपद न सोडण्यास सांगितले होते. मात्र विराटने हे मान्य केले नाही. तर सौरव गांगुलींच्या या विधानाचे विराटने स्पष्टपणे खंडन केले होते. दरम्यान आता दिलीप वेंगसरकर यांनी या पूर्ण विधानाला दुर्भाग्य असल्याचे म्हटले आहे.
कर्नल म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिलीप वेंगसरकर यांनी मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दिलीप वेंगसरकरांनी म्हटले की, “निवडकर्त्यांऐवजी सौरव गांगुलीने वक्तव्य केल्यानेच या वादात भर पडली होती.” तर हा संपूर्ण वाद म्हणजे दुर्भाग्य आहे, या वादाला वेगळ्या पध्दतीने हाताळायला हवे होते असे वेंगसरकरांनी अधिक म्हटले.
माजी मुख्य निवडकर्ते दिलीप वेंगसरकरांनी गांगुलींवर टिका करताना म्हटले की, “सौरव गांगुलीला या विषयावर निवडकर्त्याऐवजी पुढे येऊन विधान करण्याचा अधिकार नव्हता. संघातील निवड आणि कर्णधारपदाच्या वादावर मुख्य निवडकर्त्याने पुढे येऊन माहिती दिली पाहिजे”.
वेंगसरकरांनी हे देखील म्हटले की या सर्व प्रकरणावरून विराट नक्कीच दुखावला असेल. वेंगसरकरांच्या म्हणण्यानुसार विराटने भारतीय क्रिकेटसाठी खूप मोठे योगदान दिले आहे आणि बोर्डाचा त्याच्या सोबतचा असा व्यवहार त्याला त्रासदायक ठरेल.