आयपीएलच्या आगामी मोसमाआधीचा खेळाडू लिलाव गुरुवारी पार पडला. या लिलावात भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला मुंबई इंडियन्सने खरेदी केले. अर्जुनची मूळ किंमत (बेस प्राईज) २० लाख रुपये ठेवण्यात आली होती आणि याच किमतीत मुंबईने त्याला आपल्या संघात घेतले. अर्जुनने याआधी मुंबई इंडियन्सच्या नेट्समध्ये गोलंदाजी केली होती. तसेच नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत त्याला पदार्पणाची संधी मिळाली होती. मात्र, त्याला केवळ २ विकेट घेता आल्या आणि ९.५७ च्या इकोनॉमीने धावा दिल्या. त्यामुळे अर्जुनला मुंबई इंडियन्सने संघात घेतल्यावर सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. अर्जुनला केवळ तो सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्याने संधी मिळाल्याचे म्हटले गेले. मात्र, मुंबईचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेने अर्जुनला संघात घेण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
Arjun Tendulkar joins @mipaltan for INR 20 Lac. @Vivo_India #IPLAuction
— IndianPremierLeague (@IPL) February 18, 2021
अर्जुनला शिकण्याची संधी
आम्ही केवळ अर्जुनमधील क्षमता आणि गुणवत्ता पाहिली. तो सचिनचा मुलगा असल्याने त्याच्याबाबतच्या प्रत्येक गोष्टीवर सर्वांचे लक्ष असते. मात्र, सुदैवाने तो फलंदाज नसून गोलंदाज आहे. अर्जुनला आता शिकण्याची संधी मिळत आहे. त्याने नुकतेच मुंबईकडून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात केली असून आता त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल. या अनुभवातून त्याच्या खेळात सुधारणा होत जाईल. तो खूप युवा आहे. आपण त्याला वेळ दिला पाहिजे, असे जयवर्धने म्हणाला.
हेही वाचा – आयपीएल लिलावात कोणत्या संघाने कोणाला केले खरेदी, जाणून घ्या!