भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरु असून भारताने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारताने चेन्नई येथे झालेला पहिला कसोटी सामना गमावला होता. परंतु, चेन्नईतच झालेला दुसरा कसोटी सामना, तसेच अहमदाबाद येथे झालेला तिसरा कसोटी सामना भारताने मोठ्या फरकाने जिंकला. मात्र, भारताच्या या विजयांपेक्षा या सामन्याच्या खेळपट्ट्यांबाबत सध्या अधिक चर्चा होत आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन आणि केविन पीटरसन यांच्यासह भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने खासकरून तिसऱ्या सामन्याच्या खेळपट्टीवर बरीच टीका केली. तिसऱ्या कसोटी सामन्यात अगदी सुरुवातीपासूनच फिरकीपटूंना मदत मिळत होती. हा सामना अवघ्या दोन दिवसांतच संपला. त्यामुळे खेळपट्टीबाबत विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. मात्र, खेळपट्टीबाबत झालेली इतकी चर्चा भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला फारशी आवडली नाही.
इतर देशांमधील खेळपट्ट्यांबाबत चर्चा का नाही?
प्रत्येक व्यक्तीला आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी एखाद्याचे मत चूक किंवा बरोबर यावर भाष्य करणार नाही. मात्र, खेळपट्ट्यांबाबत इतकी चर्चा कशासाठी केली जाते, हेच मला कळत नाही. लोकांनी तुम्ही काय बोलत आहात हे ऐकण्यासाठी सतत खेळपट्ट्यांवर चर्चा केली जाते असे मला वाटते. इतर देशांमधील खेळपट्ट्यांबाबत चर्चा का होत नाही? असा सवाल अश्विनने उपस्थित केला.
विराट कोहलीचा व्हिडिओ व्हायरल
न्यूझीलंडमध्ये आम्ही दोन सामने खेळले आणि हे दोन सामने मिळून पाच दिवसांत संपले. मात्र, तेव्हा खेळपट्टीबाबत कोणीही काहीही बोलले नाही. मागील काही दिवसांत विराट कोहलीचा दक्षिण आफ्रिकेतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात मी इथे खेळपट्टीबाबत बोलण्यासाठी आलेलो नाही, असे तो म्हणतो. आम्ही परदेशात जर कोणत्याही खेळपट्टीवर खेळण्यासाठी तयार असतो, तर मग इतर संघ भारतात आल्यावर खेळपट्ट्यांची चर्चा का करतात, असेही अश्विन म्हणाला.