भारताचा संघ सध्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत आहे. त्यामुळे भारतात कसोटी मालिका जिंकणे हे इंग्लंडच्या संघासाठी अॅशेस विजयापेक्षाही मोठे यश असेल, असे मत इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅमी स्वानने व्यक्त केले. भारताने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात उत्कृष्ट कामगिरी केली होती. भारताने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. या मालिकेत भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली केवळ एकच सामना खेळला. मात्र, असे असतानाही अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. त्यामुळे आता भारतीय संघाचा आत्मविश्वास आणखी वाढला असेल, असे स्वानला वाटते.
भारताचा संघ कसोटीत सर्वोत्तम
भारताचा संघ सध्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियात जाऊन कसोटी मालिका जिंकणे, हे कोणत्याही संघासाठी सर्वात मोठे आव्हान असते. ही मालिका जिंकल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास आणखी वाढला असेल. त्यामुळे आता इंग्लंडसाठी भारतात कसोटी मालिका जिंकणे हे अॅशेस विजयापेक्षाही मोठे यश असेल, असे स्वान म्हणाला.
श्रीलंकेत जिंकल्याचा इंग्लंडला फायदा
इंग्लंडने नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत श्रीलंकेला २-० असा व्हाईटवॉश दिला. श्रीलंकेत खेळल्याचा आणि जिंकल्याचा इंग्लंडला आता भारतात फायदा होईल, असे स्वानला वाटते. श्रीलंकेतील कामगिरीचा इंग्लंडला भारतात नक्कीच फायदा होईल. मात्र, इंग्लंडचे फिरकीपटू डॉम बेस आणि जॅक लिच यांना भारतात विकेट मिळवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल, असेही स्वानने सांगितले.
हेही वाचा – भारतीय टॅक्सी चालकाचा मुलगा ऑस्ट्रेलियाच्या ‘संघा’त!