भारताच्या संघाला जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील ४x४०० मिश्र रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याआधी झालेल्या प्राथमिक फेरीत दमदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठल्यामुळे भारताच्या या संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला.
४x४०० मिश्र रिलेच्या अंतिम फेरीत मोहम्मद अनस, विके विस्मया, जिस्ना मॅथ्यू आणि निर्मल नोह टॉम यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने ३ मिनिटे १५.७७ सेकंद अशी वेळ नोंदवली. ही भारतीय संघाची या मोसमातील सर्वोत्तम वेळ होती. मात्र, असे असतानाही आठ संघांचा समावेश असलेल्या या शर्यतीत भारताचा सातवा क्रमांक आला.
मोहम्मद अनस, विके विस्मया, जिस्ना मॅथ्यू यांना चांगली कामगिरी करता आली नाही. परंतु, निर्मल नोह टॉम अंतिम क्षणांत वेगाने धावल्यामुळे भारताला सातवा क्रमांक मिळाला. ४x४०० मिश्र रिलेत अमेरिकेच्या संघाने ३ मिनिटे ०९.३४ सेकंद अशी विश्व विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले.
अमेरिकेच्या संघातील अॅलिसन फेलिक्सचे हे जागतिक स्पर्धेतील विक्रमी १२ वे सुवर्णपदक होते. त्यामुळे तिने महान युसेन बोल्टचा ११ सुवर्णपदकांचा विक्रम मोडीत काढला. जमैका (३ मिनिटे ११.७८ सेकंद) आणि बहारीन (३ मिनिटे ११.८२ सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवले.