भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये पुढील महिन्यात पहिल्यावाहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना १८ ते २२ जून या कालावधीत साऊथहॅम्पटन येथे होईल. दोन्ही संघांना ‘होम अॅडव्हान्टेज’ नसल्याने हा सामना चुरशीचा होईल अशी सर्व क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहे. भारताला हा सामना जिंकायचा असल्यास फलंदाजांनी दमदार कामगिरी करणे गरजेचे आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले. तसेच इंग्लंडमध्ये हवामान सतत बदलत राहते. त्यामुळे या सामन्यात प्रत्येक सत्र खूप महत्वाचे असणार आहे, असेही १९८३ वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचे कर्णधार असलेल्या कपिल देव यांना वाटते.
फलंदाजांची कसोटी लागेल
न्यूझीलंडच्या तुलनेत भारताची फलंदाजांची फळी मजबूत वाटते. परंतु, त्यांनी परिस्थितीनुसार खेळ करणे गरजेचे आहे. माझ्या मते, अंतिम सामन्यात फलंदाजांची भूमिका सर्वात महत्वाची असेल. आता भारताच्या विजयांमध्ये गोलंदाज महत्वाची भूमिका बजावतात. परंतु, फलंदाजांचा दर्जा अंतिम सामन्याचा विजेता ठरवेल. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी करणे गरजेचे आहे. इंग्लंडमध्ये हवामान एका मिनिटात बदलू शकते. तिथे फलंदाजांची कसोटी लागेल, असे कपिल म्हणाले.
कोहलीने अति आक्रमकपणे खेळू नये
भारताचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. परंतु, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्याने अति आक्रमक खेळ करता कामा नये, असे कपिल यांना वाटते. कोहली चांगली कामगिरी करेल अशी मला अपेक्षा आहे. तो परिस्थितीनुसार त्याच्या खेळात बदल करतो. मात्र, त्याने अति आक्रमकपणे खेळू नये. त्याने संयम राखल्यास त्याला धावा करण्यापासून रोखणे न्यूझीलंडला अवघड होईल, असेही कपिल यांनी सांगितले.