जून महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (जागतिक कसोटी अजिंक्यपद) स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. मुंबईकर युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याला या संघात स्थान मिळालेले नाही. पृथ्वीला यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. तो पहिल्या सामन्यात दोन डावांत मिळून केवळ चार धावा (० आणि ४) धावा करू शकला होता. त्यामुळे त्यानंतरच्या तीन सामन्यांसाठी त्याला संघातून वगळण्यात आले होते. परंतु, त्यानंतर त्याने स्थानिक स्पर्धा आणि आयपीएलमध्ये दमदार खेळ केला होता. असे असतानाही निवड समितीने त्याला पुन्हा कसोटी संघात स्थान दिलेले नाही.
India’s squad: Virat Kohli (C), Ajinkya Rahane (VC), Rohit Sharma, Gill, Mayank, Cheteshwar Pujara, H. Vihari, Rishabh (WK), R. Ashwin, R. Jadeja, Axar Patel, Washington Sundar, Bumrah, Ishant, Shami, Siraj, Shardul, Umesh.
KL Rahul & Saha (WK) subject to fitness clearance.
— BCCI (@BCCI) May 7, 2021
सहा वेगवान गोलंदाज
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २२ जून या कालावधीत साऊथहॅम्पटन येथे पार पडणार आहे. त्यानंतर ४ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या दोन्हीसाठी शुक्रवारी भारताचा संघ जाहीर झाला. विराट कोहली या २० सदस्यीय संघाचे नेतृत्व करणार असून मुंबईकर अजिंक्य रहाणे उपकर्णधार असेल. तसेच जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आणि उमेश यादव या सहा वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), अश्विन, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर,जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आणि उमेश यादव.
लोकेश राहुल आणि वृद्धिमान साहा (फिटनेस टेस्ट पास झाल्यावर संघात)