भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्याची सुरुवात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्याने होणार आहे. भारतीय संघाला या सामन्याच्या तयारीसाठी फारसा वेळ मिळालेला नाही. भारताचे खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळत होते. ही स्पर्धा स्थगित झाल्यावर ते आपापल्या घरी परतले आणि त्यानंतर मागील १४ दिवस ते मुंबईमध्ये क्वारंटाईन होते. या काळात त्यांना सराव करण्याची संधी मिळाली नाही. परंतु, भारतीय संघाला १८ जूनपासून साऊथहॅम्पटन येथे होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी सराव करण्याची फारशी संधी मिळालेली नसली, तरी त्याची कर्णधार विराट कोहलीला चिंता नाही. भारतीय संघ याआधी इंग्लंडमध्ये बरेच सामने खेळला असून हा अनुभव फायदेशीर ठरेल, असे कर्णधार कोहलीला वाटते.
योग्य मानसिकतेने मैदानात उतरणे गरजेचे
आम्ही याआधी काही ठिकाणी सामन्याच्या केवळ तीन दिवसांपूर्वी पोहोचलो आहोत. परंतु, त्यानंतरही आम्हाला सामने जिंकण्यात आणि प्रतिस्पर्धी संघाला झुंज देण्यात यश आले आहे. त्यामुळे सराव करण्याची संधी मिळालेली नसल्याची मला फारशी चिंता नाही. इंग्लंडमध्ये खेळण्याची ही आमची पहिली वेळ नाही. आम्हाला तेथील वातावरण आणि परिस्थिती पूर्णपणे माहिती आहे. परंतु, तुम्हाला परिस्थिती माहित असूनही योग्य मानसिकतेने मैदानात उतरला नाहीत, तर फलंदाज म्हणून तुम्ही पहिल्याच चेंडूवर बाद होऊ शकता किंवा तुम्हाला गोलंदाज म्हणून विकेट घेण्यात अपयश येऊ शकते, असे कोहली म्हणाला.
चार सराव सत्रही पुरेशी
तसेच भारतीय संघाला केवळ चार सराव सत्रही पुरेशी ठरतील असे कोहलीला वाटते. सामन्यापूर्वी आम्हाला चार सराव सत्र मिळाली, तरी तीसुद्धा पुरेशी असतील. आम्ही संघ म्हणून कशी कामगिरी करू शकतो हे आम्हाला ठाऊक आहे, असे कोहलीने सांगितले. कोहलीने याआधी इंग्लंडमध्ये १० कसोटी सामने खेळले असून त्यात ३६.३५ च्या सरासरीने ७२७ धावा केल्या आहेत.