आशिया चषक स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान बऱ्याच दिवसांनी एकमेकांसमोर येणार आहेत. पण पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली याने सामन्याला अजून बरेच दिवस असतानाच भारतावर दबाव टाकायला सुरूवात केली आहे.
भारतावर सगळा दबाव
चॅम्पिअन्स ट्रॉफी या स्पर्धेत पाकिस्तानने भारतीय संघाचा पराभव केला होता. त्यामुळे सध्या पाकिस्तानचे भारतावर वर्चस्व असल्याचे विधान हसन अली याने केले आहे. तो म्हणाला, “आम्ही काही काळापूर्वीच भारताला हरवले असल्याने सगळा दबाव भारतावर आहे. हे सामने युएईमध्ये होणार आहेत. युएईमध्ये आम्ही सतत खेळात असतो. त्यामुळे ते आमचे घरचेच मैदान आहे. त्यामुळे या गोष्टीचा आम्हाला फायदा होऊ शकतो. मला या सामन्यात सगळ्या विकेट घ्यायला आवडेल. पण ते शक्य नाही.”
Hasan Ali believes Virat Kohli’s absence gives Pakistan the edge in the upcoming Asia Cup https://t.co/E0RKg9LOHW pic.twitter.com/NIvzyaKvPN
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 6, 2018
कोहलीची कमी भारताला जाणवेल
इंग्लंडविरुद्ध सध्या सुरू असलेली कसोटी मालिका संपल्यावर लगेचच आशिया चषक स्पर्धा सुरु होणार आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीला या स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. याबद्दल अली म्हणाला, “कोहली हा खूप चांगला खेळाडू आहे. सगळ्यांनाच माहित आहे की तो एक मॅच विनर आहे. तो नसल्याची कमी भारताला नक्कीच जाणवेल. भारताकडे इतरही चांगले खेळाडू आहेत. पण विराट कोहली नसणे याचा फायदा आम्हाला होऊ शकेल. कोहली या स्पर्धेत खेळात असता तर मला त्याची विकेट घ्यायला नक्कीच आवडले असते. पण कोहली नसला तरी इतर फलंदाजांचीही विकेट घ्यायला मला आवडेल.”