एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियात झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये ६५ किलो वजनी गटात भारताला सुवर्ण पदक जिंकून देणाऱ्या बजरंग पुनियाने पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरी करत ‘यासर दोगू आंतरराष्ट्रीय कुस्ती’ स्पर्धेत ७० किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. विशेष म्हणजे बजरंगने या वर्षात सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक पटकावले आहे. सोबतच संदीप तोमरला रौप्य पदक तर महिलांमध्ये पिंकीला ५५ किलो गटात सुवर्णपदक मिळाले आहे. या स्पर्धेत भारताने एकूण १० पदके मिळवली असून १० पैकी ७ पदके ही महिला कुस्तीपटूंनी मिळवली आहेत.
सामन्यात न उतरता मिळवले सुवर्णपदक
बजरंग पुनियाचा ७० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यातील प्रतिस्पर्धी आंद्रे क्वायातकोवस्की दुखापतीमुळे सामन्यात खेळू शकला नाही. त्यामुळे बजरंगने एकही सामना न खेळता सुवर्ण पदकाची कमाई केली. तर संदीप तोमरला ६१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात इराणच्या मोहम्मद याककेशने २-८ असे पराभूत केले. त्यामुळे संदीपला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर विकीने शनिवारी ५७ किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले होते.
महिलांनी मारली बाजी
महिलांमध्ये पिंकीने ५५ किलो वजनी गटात एकमात्र सुवर्णपदक जिंकले. तिने युक्रेनच्या ओल्गा शाँइडरला ६-३ असे हरविले. पण ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती साक्षी मलिक ६२ किलो वजनी गटात पदक मिळवण्यात अपयशी ठरली. राष्ट्रकुलनंतरची ही साक्षीची पहिली स्पर्धा होती. तसेच महिलांच्या ५३ किलो आणि ५७ किलो वजनी गटात भारताला सुवर्णपदके जिंकण्याची संधी होती. मात्र, सीमा आणि पूजा धांडा या दोघीही आपापल्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्या. तरीही भारतीय महिलांनी एकूण सात पदके जिंकत उत्कृष्ट कामगिरी बजावली.