वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला चार वेगवान गोलंदाज खेळवायचे असल्यास त्यांनी मोहम्मद सिराजच्या आधी शार्दूल ठाकूरला संधी दिली पाहिजे, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी सदस्य शरणदीप सिंग यांनी व्यक्त केले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातीलवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला पुढील शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे. साऊथहॅम्पटन येथे होणाऱ्या या सामन्यात ढगाळ वातावरण असल्यास भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजांसह खेळू शकेल. शार्दूल उपयुक्त फलंदाज असल्याने भारताने त्याला संधी देण्याचा विचार केला पाहिजे, असे शरणदीप यांना वाटते.
शार्दूलमध्ये धावा करण्याची क्षमता
ढगाळ वातावरण असल्यास भारतीय संघ एक अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवू शकेल. ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यानंतर चौथा वेगवान गोलंदाज म्हणून भारताने शार्दूलला संधी दिली पाहिजे. भारताकडे मोहम्मद सिराजचा पर्याय आहे. सिराजने उत्तम कामगिरी केली असली तरी माझी पसंती शार्दूलला असेल. तळाच्या फलंदाजांनीही योगदान देणे गरजेचे असून शार्दूलमध्ये धावा करण्याची क्षमता आहे, असे शरणदीप म्हणाले.
जाडेजा संघातून आऊट?
अंतिम सामन्यात भारताने चार वेगवान गोलंदाज खेळवल्यास डावखुरा अष्टपैलू रविंद्र जाडेजाला संघाबाहेर बसावे लागेल, असे शरणदीप सिंग यांना वाटते. न्यूझीलंडच्या संघात बरेच डावखुरे फलंदाज असून ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनविरुद्ध ते अडचणीत सापडू शकतील. त्यामुळे दुर्दैवाने जाडेजाला संघाबाहेर बसावे लागू शकेल, असे शरणदीप यांनी सांगितले.