भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना १८ ते २२ जून या कालावधीत साऊथहॅम्पटन येथे खेळला जाईल. या सामन्यापूर्वी भारतीय संघ ‘व्यवस्थापित अलगीकरणात’ राहणार असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केले. भारतीय संघ सध्या मुंबईमध्ये क्वारंटाईन असून ३ जूनला इंग्लंडमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आयसीसीने दिली. परंतु, इंग्लंडमध्ये दाखल झाल्यावर भारतीय संघाला किती दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.
रिपोर्ट सोबत ठेवणे अनिवार्य
भारत आणि न्यूझीलंड हे जागतिक क्रमवारीतील सध्याच्या घडीचे अव्वल दोन संघ असून त्यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. हा सामना साऊथहॅम्पटनच्या हॅम्पशायर बोल मैदानात पार पडणार असून न्यूझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात द्विपक्षीय कसोटी मालिका होणार आहे. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना होईल. भारतामध्ये १४ दिवस क्वारंटाईन राहिल्यावर भारतीय संघ ३ जूनला इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. खेळाडूंना कोरोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवणे अनिवार्य असणार आहे.
क्वारंटाईनचा कालावधी अस्पष्ट
चार्टर्ड विमानाने इंग्लंडमध्ये दाखल झाल्यावर भारतीय संघाला थेट साऊथहॅम्पटनच्या मैदानातच असलेल्या हॉटेलमध्ये नेण्यात येईल. तेथे त्यांची पुन्हा कोरोना चाचणी होईल आणि त्यानंतर त्यांच्या व्यवस्थापित अलगीकरणाच्या कालावधीला सुरुवात होईल, असे आयसीसीने सांगितले. परंतु, साऊथहॅम्पटन येथे भारतीय खेळाडूंना किती काळ क्वारंटाईन व्हावे लागणार हे स्पष्ट करण्यात आले नाही. न्यूझीलंडच्या खेळाडूंना तीन दिवस क्वारंटाईन राहणे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) अनिवार्य केले होते. या काळात खेळाडूंना सराव करण्याचीही परवानगी नव्हती.