भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्याला पुढील शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय खेळाडूंनी साऊथहॅम्पटन येथे सरावाला सुरुवात केली आहे. खेळाडूंना तीन किंवा चार जणांच्या गटांमध्ये सराव करण्याची परवानगी आहे. शुक्रवारी त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी संपल्यावर ते एकत्र सराव करू शकतील. त्यानंतरचा एक आठवडा विशेषतः मोहम्मद सिराज आणि ईशांत शर्मा या वेगवान गोलंदाजांसाठी महत्वाचा असणार आहे. भारतीय संघ अंतिम सामन्यात सिराजला संधी देण्यास उत्सुक असून ईशांतला संघाबाहेर बसावे लागू शकेल, अशी माहिती आहे.
अवघड निर्णय घ्यावे लागणार
ऑगस्ट २०१९ मध्ये झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर ईशांत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे तेज त्रिकुट फिट असल्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी प्लेईंग ११ ची निवड करताना भारताला काही अवघड निर्णय घ्यावे लागणार आहेत. भारतीय संघाने मागील तीन-चार वर्षांत परदेशात यशस्वी कामगिरी केली असून यात ईशांत, बुमराह आणि शमी या वेगवान गोलंदाजांचा सिंहाचा वाटा आहे.
सिराजला संधी देण्याचा विचार
प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत सिराजला ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोने केले. त्यातच त्याच्याकडे उसळी घेणारे चेंडू टाकण्याची क्षमता असल्याने भारतीय संघ १०१ कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या ईशांतच्या जागी सिराजला संधी देण्याचा विचार करत आहे. सिराजला आतापर्यंत पाच कसोटीत १६ विकेट घेण्यात यश आले आहे.