भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये या महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना १८ ते २२ जून या कालावधीत साऊथहॅम्पटन येथे खेळवला जाणार आहे. जागतिक कसोटी क्रमवारीत भारतीय संघ अव्वल, तर न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे या सामन्याचा विजेता कोण ठरणार हे सांगणे अवघड आहे, असे भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल म्हणाला. तसेच न्यूझीलंडची अजूनही जागतिक क्रिकेटमधील सर्वात बलाढ्य संघांमध्ये गणना होत आहे. मात्र, न्यूझीलंडचा संघ या गोष्टीकडे फारसे लक्ष देत नाही. ते केवळ सांघिक खेळ करण्याचा प्रयत्न करतात आणि हेच त्यांच्या यशाचे रहस्य असल्याचे पार्थिवने सांगितले.
स्वतःच्या कामगिरीपेक्षा संघाच्या यशाला महत्व
न्यूझीलंडचा संघ प्रत्येक सामन्यात सांघिक खेळ करतो. हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे. प्रत्येक संघात काही मोठे खेळाडू असतात. परंतु, न्यूझीलंडच्या संघाला त्यांच्या मर्यादा माहित आहेत. एखाद्या खेळाडूने मर्यादित वेळेत ४०-५० धावा केल्या, तर आपला संघ विजयी ठरू हे त्यांना ठाऊक आहे. केन विल्यमसन किंवा टॉम लेथम यांसारख्या खेळाडूंची कोणत्याही संघाला भीती वाटत नाही. परंतु, हे खेळाडू स्वतःच्या कामगिरीपेक्षा संघाच्या यशाला महत्व. ते सांघिक खेळ करतात. त्यामुळे आयसीसीच्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडला यश मिळत आहे, असे पार्थिव म्हणाला.
अंतिम सामन्याची आतुरतेने वाट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याला १८ जूनपासून सुरुवात होणार असून या सामन्याची न्यूझीलंडचे खेळाडू आतुरतेने वाट पाहत असल्याचे कर्णधार विल्यमसन म्हणाला होता. भारताविरुद्ध खेळणे हे नेहमीच मोठे आव्हान असते. मात्र, आम्हाला हे आव्हान स्वीकारताना खूप मजा येते. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध खेळण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. अंतिम सामन्याची आम्ही सगळेच आतुरतेने वाट पाहत आहोत, असे विल्यमसनने सांगितले होते.