भारतीय संघाने यावर्षाच्या सुरुवातीला सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करत कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. भारताच्या बऱ्याच प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्या, तसेच कर्णधार विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतला. परंतु, त्यानंतरही अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकत बॉर्डर-गावस्कर करंडक आपल्याकडे राखला. ऑस्ट्रेलियातील या कसोटी मालिका विजयाने भारतीय संघाला वेगळाच विश्वास दिला, असे विधान भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने केले.
बदललेल्या नियमांमुळे दडपण होते
आमच्यासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास व्यावसायिक आणि भावनिक होता. ही आयसीसीची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला एकदिवसीय वर्ल्डकप इतकेच महत्व आहे. केवळ एका महिन्यातील नाही, तर सलग दोन वर्षे केलेल्या दमदार कामगिरीमुळे आम्ही अंतिम फेरी गाठली आहे. कोरोनामुळे काही नियम बदलण्यात आले. त्यामुळे आमच्यावर दडपण होते. मात्र, त्यानंतर आम्ही ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आणि इंग्लंडला भारतात ३-१ असे पराभूत केले, असे ईशांत म्हणाला.
आमचा आत्मविश्वास खूप वाढला
आम्ही कोणत्याही परिस्थितीत, कितीही दडपण असताना दमदार पुनरागमन करू शकतो, हे आम्हाला कळले. मी ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणाऱ्या संघाचा भाग नव्हतो. परंतु, त्या विजयाने भारतीय संघाला एक वेगळाच विश्वास दिला. आमचा आत्मविश्वास खूप वाढला, असेही ईशांत म्हणाला. तसेच भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सज्ज असल्याचेही त्याने सांगितले.