भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना १८ ते २२ जून या कालावधीत साऊथहॅम्पटन येथे खेळला जाईल. या सामन्यात वेगवान गोलंदाजांना मदत असल्यास भारताचा कर्णधार विराट कोहलीला धावांसाठी झुंजावे लागेल, असे मत न्यूझीलंडचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक ग्लेन टर्नर यांनी व्यक्त केले. साऊथहॅम्पटनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल असण्याची शक्यता आहे. या सामन्यात चेंडू स्विंग व सिम झाल्यास कोहलीसह भारताचे सर्वच फलंदाज अडचणीत सापडतील, असे टर्नर यांना वाटते.
धावांसाठी झुंजावे लागेल
वयामुळे कोहलीकडे चेंडू खेळण्यासाठी असणारा वेळ कमी झाला आहे का, यावर मी भाष्य करू इच्छित नाही. परंतु, वेगवान गोलंदाजांना मदत असल्यास त्याला धावा करण्यासाठी झुंजावे लागेल. अंतिम सामन्यात खेळपट्टी आणि वातावरण स्विंग व सिम गोलंदाजीला अनुकूल असल्यास भारताचे सर्वच फलंदाज अडचणीत सापडतील. याचा प्रत्यय आपल्याला याआधी न्यूझीलंडमध्ये आला आहे, असे टर्नर म्हणाले. भारताने मागील वर्षी न्यूझीलंडचा दौरा केला होता. या दौऱ्यातील दोन्ही कसोटी सामने भारताने गमावले होते आणि या मालिकेत न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांना अडचणीत टाकले होते. कोहली चार डावांत केवळ ३८ धावा करू शकला होता.
वातावरणाचा न्यूझीलंडला फायदा
जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वातावरण खूप महत्त्वाचे असेल. फलंदाज कोणत्या देशाचा आहे, यावर त्याचे फलंदाजीचे तंत्र आणि शैली ठरते. इंग्लंड आणि न्यूझीलंडमधील वातावरणात फारसा फरक नाही. याचा न्यूझीलंडला फायदा होऊ शकेल. आता भारतातील खेळपट्ट्यांकडूनही वेगवान गोलंदाजांना मदत मिळत आहे. परंतु, भारतातील खेळपट्ट्यांची न्यूझीलंड आणि इंग्लंडमधील खेळपट्ट्यांशी तुलना होऊ शकत नाही, असे टर्नर यांनी नमूद केले.