पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना नुकताच पार पडला. या सामन्यात भारताला पराभूत करत न्यूझीलंडने पहिले टेस्ट चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. मात्र, या सामन्याला काहीच दिवस झाले असताना आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वाची तयारी सुरु केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होईल. तसेच या नव्या पर्वासाठी आयसीसीने ‘पॉईंट सिस्टीम’मध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
सामना अनिर्णित राहिल्यास प्रत्येकी चार गुण
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वात प्रत्येक सामन्यातील विजेत्या संघाला १२ गुण दिले जाणार आहेत. तसेच सामना बरोबरीत राहिल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी सहा गुण, तर सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी चार गुण मिळतील. आयसीसीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ अॅलर्डाइस यांनी या महिन्याच्या सुरुवातीला ‘पॉईंट सिस्टीम’मध्ये बदल करणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता गुण देण्याच्या पद्धतीत बदल झालेला आहे.
प्रत्येक सामन्यामध्ये समान गुण दिले जाणार
पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक मालिकेत १२० गुण दिले जात होते. कसोटी मालिका दोन सामन्यांची आहे किंवा पाच सामन्यांची, याने फरक पडत नव्हता. मात्र, दुसऱ्या पर्वात प्रत्येक सामन्यामध्ये समान गुण दिले जाणार आहेत. प्रत्येक सामन्यातील विजेत्या संघाला १२ गुण मिळतील. संघांनी किती सामन्यांमध्ये किती गुण मिळवले याच्या टक्क्यांवर त्यांचे गुणतालिकेतील स्थान ठरेल, असे आयसीसी मंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले.