मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने 184 धावांनी भारतावर विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पराभवासाठी भारतीय संघाला 340 धावांचे आव्हान पार करायचे होते. पण भारतीय संघाला 155 धावांपर्यंतच मजल मारता आली. परिणामी भारतीय संघ 155 धावांवर सर्वबाद झाला. पण या सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल ज्यापद्धतीने बाद झाला, त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे यशस्वी जैस्वालची विकेट वादग्रस्त ठरली. परिणामी भारतीय चाहत्यांकडून थर्ड अंपायरच्या निर्णायावर ताशेरे ओढले जात आहेत. तसेच, माजी कर्णधार सूनील गावस्कर यांनीही संताप व्यक्त केला आहे. (Yashasvi Jaiswal out without Snicko spike 3rd Umpire overturn infield decision Sunil Gavaskar)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 340 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. मात्र, भारताने 340 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नियमित अंतराने विकेट्स गमावल्या होत्या. 130 धावांवरच भारताने 6 विकेट्स गमावल्या होत्या. परंतु, एक बाजू सलामीवीर यशस्वी जैस्वालने सांभाळली होती. त्याने अर्धशतक केले. तसेच 200 पेक्षाही अधिक चेंडू खेळले होते. अशात भारतीय संघाला पराभवापासून दूर राहण्यासाठी जैस्वाल याचे खेळपट्टीवर असणे महत्त्वाचे होते. परंतू, 71 व्या षटकात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवेळी जैस्वाल पूल शॉर्ट मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.
“I can see the ball has made contact with the gloves. Joel, you need to change your decision.”
And with that, Jaiswal is out! #AUSvIND pic.twitter.com/biOQP4ZeDB
— 7Cricket (@7Cricket) December 30, 2024
यशस्वीने पूल शॉर्ट मारण्याच्या प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅट आणि ग्लव्हजच्या खूपच जवळून गेला आणि थेट यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरेने तो पकडला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने जैस्वाल बाद असल्याचे अपील केले. परंतु, मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद दिले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने डीआरएसची मागणी केली. डीआरएसमध्ये स्निको मीटरमध्ये स्पाईक्स दाखवले नाही. मात्र थर्ड अंपायर शरपुद्दुला यांनी बराचवेळ रिप्ले पाहिला. त्या रिप्लेमध्ये चेंडूचा हलका स्पर्श ग्लव्ह्जला झाल्याचे भासत होते. त्यामुळे थर्ड अंपायरने जैस्वालला बाद ठरवले.
थर्ड अंपायरचा हाच निर्णय वादग्रस्त ठरला आहे. कारण स्निको मीटरमध्ये स्पाईक्स दिसले नसतानाही बाद दिल्याने जैस्वाल चिडल्याचे दिसले. तो याबाबत पंचांशीही बोलला, पण त्यांनी त्याला माघारी जाण्यास सांगितले. याशिवाय समालोचकही आश्चर्यचकीत झाले. समालोचन करत असलेले सुनील गावसकर ही थर्ड अंपायरच्या निर्णयावर भडकले. स्टेडियममधील प्रेक्षकांनीही या निर्णयाविरोधात घोषणाबाजी दिली.
सूनील गावस्करांचा संताप
एका क्रीडा वाहिनीवर समालोचन करत असताना सुनील गावस्कर यांनी यशस्वी जैस्वाल याच्या वादग्रस्त विकेटवर संताप व्यक्त केला. “हा एक ऑप्टिकल भ्रम असू शकतो. जर तुमचा तंत्रज्ञानावर विश्वास नसेल, तर हे तंत्रज्ञान ठेवू नका. जर थर्ड अंपायरला मैदानावर उभ्या असलेल्या अंपायरचा निर्णय उलटवायचा असेल तर, मग त्याच्याकडे ठोस पुरावे असावेत.” त्याच वेळी, तिसऱ्या पंचाने सांगितले की, मी पाहतो की चेंडू हातमोजेला लागला आहे. जोएल तुम्हाला तुमचा निर्णय बदलावा लागेल”, अशा शब्दांत सुनील गावस्कर यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, या विकेटमुळे सलग दुसऱ्यांदा जैस्वालचे शतक हुकले. पहिल्या डावात यशस्वी 82 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात 208 चेंडूत 8 चौकारांसह 84 धावांची खेळी करून माघारी परतावे लागले.
हेही वाचा – BGT IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा 184 धावांनी पराभव