भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. यशपाल हे मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जायचे. भारताने १९८३ साली पहिल्यांदा एकदिवसीय वर्ल्डकपवर आपले नाव कोरले होते. भारताच्या या ऐतिहासिक विश्वविजयात यशपाल यांची खूप महत्त्वाची भूमिका होती. यशपाल यांनी या स्पर्धेच्या ८ सामन्यांत २४० धावा केल्या होत्या, यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. १९८३ वर्ल्डकप विजेत्या संघातील सहकाऱ्याच्या निधनाने या संघाचे कर्णधार कपिल देव, तसेच दिलीप वेंगसरकर यांना धक्का बसला आहे.
विश्वासच बसत नाही
‘यशपालचे निधन झाले यावर माझा विश्वासच बसत नाही. आम्ही मागील आठवड्यातच भेटलो होतो आणि त्यावेळी तो अगदी तंदुरुस्त दिसत होता,’ असे कपिल देव म्हणाले. यशपाल यांनी १९८३ वर्ल्डकपच्या सलामीच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध आणि उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध दोन महत्त्वपूर्ण अर्धशतके केली होती. त्यामुळे भारताच्या विश्वविजयात त्यांची मोलाची भूमिका होती. त्यांच्या निधनाची बातमी कळताच दिलीप वेंगसरकारांनाही धक्का बसला.
यशपाल सर्वात फिट होता
‘मला विश्वासच बसत नाही. आम्ही मागील आठवड्यात १९८३ वर्ल्डकप विजेत्या संघाचे सर्व सदस्य एकत्र भेटलो होतो. आम्हा सर्वांमध्ये यशपाल सर्वात फिट होता. तू इतका फिट कसा राहतोस, असे मी त्याला विचारलेसुद्धा होते. तो शाकाहारी होता आणि दररोज सकाळी चालायला जायचा. त्यामुळे त्याने फिटनेस राखला होता. आता त्याचे निधन झाले यावर माझा विश्वास बसत नाही, असे वेंगसरकर म्हणाले.